
पाचोरा येथे जिल्हा परिषद आपल्या दारी’ उपक्रम ; उद्या तक्रार निवारण सभेचे आयोजन
पाचोरा प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या जनकेंद्रीत उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या, अडचणी आणि तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यासाठी पाचोरा येथे तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा उद्या, ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील तात्यासाहेब आर. ओ. पाटील व्यापारी संकुलात होणार आहे.
समस्यांचे जागेवरच निराकरण
या सभेला आमदार किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी जिल्हा स्तरावरील सर्व विभागप्रमुखही उपस्थित राहतील. ग्रामीण भागातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची नोंद करून त्यांना टोकन दिले जाईल. टोकन क्रमांकानुसार तक्रारदारांची समस्या ऐकून घेतली जाईल आणि त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील.
या संदर्भात पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के.बी. अंजने यांनी माहिती दिली. या सभेला ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन पंचायत समिती प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





