
‘पैशे नाहीत तर हरभरे तरी दे’ करत ४ हजारांची लाच मागणाऱ्या भूकरमापकाला अटक
जळगाव, “पैशे नाहीत तर हरभरे तरी दे,” अशी विचित्र मागणी करणाऱ्या भूकरमापकाला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. रावेर येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेला भूकरमापक राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८) याला निंभोरा (ता. एरंडोल) येथे ४ हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली.
शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.मस्कावद (ता. रावेर) येथील एका ३० वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीच्या मोजमापासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. मोजमापानंतर, कुलकर्णी यांनी शेतातील खुणा दाखवण्यासाठी ५,५०० रुपयांची मागणी केली. शेतकऱ्याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर, कुलकर्णी यांनी चक्क हरभऱ्याच्या स्वरूपात लाच मागितली.
शेतकऱ्याला हे मान्य नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पडताळणीत कुलकर्णी यांनी ५,००० आणि अखेरीस ४,००० रुपयांवर तडजोड केली.२६ मार्च रोजी निंभोरा येथे सापळा रचून कुलकर्णी याला ४,००० रुपये लाच घेताना पकडण्यात आले. पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पो. कॉ. राकेश दुसाने आणि पो. कॉ. अमोल सूर्यवंशी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशा कारवाया भविष्यातही सुरू राहतील,” असे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना लाच मागणीच्या घटना टोल फ्री क्रमांक १०६४ वर कळवण्याचे आवाहन केले आहे.