
ई-बाईक टॅक्सी व पीएम ई-बस योजनांविरोधात रिक्षा संघटनांचा एल्गार; २१ मे रोजी राज्यभर धरणे आंदोलन
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या उद्देशाने ई-बाईक टॅक्सी व पीएम ई-बस योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे राज्यातील लाखो ऑटोरिक्षा चालकांचा पारंपरिक रोजगार धोक्यात येणार असल्याचा आरोप करत रिक्षा संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर २१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांच्या संयुक्त कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष शंशाक राव आणि महासचिव विलास भालेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. जळगावमध्ये हे आंदोलन सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर होईल.
यावेळी परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्त यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे. ई-बाईक टॅक्सी आणि ई-बस योजना राबवताना रिक्षा व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले असून, यामुळे सुमारे १५ लाख ऑटोरिक्षा चालकांचा रोजगार संकटात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
संघटनांनी सरकारकडून पुढील मागण्या केल्या आहेत :
1. ई-बाईक टॅक्सी आणि पीएम ई-बस योजना तत्काळ रद्द कराव्यात.
2. रिक्षाचालकांवरील अन्याय थांबवून पारंपरिक व्यवसायाचे संरक्षण करावे.
3. शासन निर्णय घेण्याअगोदर संबंधित घटकांशी सल्लामसलत करावी.
या आंदोलनात सर्व ऑटोरिक्षा युनियन संघटना आणि रिक्षाचालक-मालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य सरकारने जर योग्य पावले उचलली नाहीत, तर पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या संघटनांनी दिला आहे.