मद्यावरील करवाढीविरोधात बार-रेस्टॉरंटचा बंद यशस्वी; सरकारचे ८० कोटींचे नुकसान

मद्यावरील करवाढीविरोधात बार-रेस्टॉरंटचा बंद यशस्वी; सरकारचे ८० कोटींचे नुकसान
मुंबई : राज्य सरकारने मद्यावरील व्हॅट, परवाना शुल्क आणि उत्पादन शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याच्या निषेधार्थ सोमवारी राज्यभरातील बार आणि रेस्टॉरंट चालकांनी पुकारलेला बंद १०० टक्के यशस्वी ठरल्याचा दावा ‘आहार’ या हॉटेल-रेस्टॉरंट संघटनेने केला आहे. या बंदमुळे शासनाचे अंदाजे ७० ते ८० कोटी रुपयांचे महसूल नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सरकारने अलीकडेच मद्यावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) ५ टक्क्यांवरून १० टक्के केला असून, परवाना शुल्कात १५ टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. या निर्णयामुळे हॉटेल व रेस्टॉरंट उद्योगासमोर गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे, असे संघटनेचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी पुढे म्हणाले, “राज्यात सध्या १९ हजारांहून अधिक परवानाधारक बार आणि लाऊंज कार्यरत आहेत आणि दरवर्षी यामध्ये ८ टक्क्यांहून अधिक वाढ होत असते. या उद्योगात सुमारे ४ लाख थेट, तर १८ लाखांपेक्षा अधिक अप्रत्यक्षरित्या रोजगार संधी उपलब्ध आहेत. शिवाय सुमारे ४८ हजार पुरवठादारांचा व्यवसायही याच क्षेत्रावर अवलंबून आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा व्यापक परिणाम या संपूर्ण यंत्रणेवर होणार आहे.”
आहार संघटनेने सरकारकडे करवाढीचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची आणि उद्योगास दिलासा देण्याची मागणी केली आहे.





