जळगांव

सुसंवाद असला तर शालेय कामकाज व्यवस्थापन उत्कृष्ट – वैद्यकीय सामाजिक अधिकारी भरत चौधरी

शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्रात पालक मेळावा संपन्न

जळगांव l २४ ऑगस्ट २०२३ l पालक, विद्यार्थी, कर्मचारी व अधिकारी यांच्यात चांगला सुसंवाद असला तर शालेय कामकाज व्यवस्थापन उत्कृष्ट होते. असे मत समाज कल्याण दिव्यांग कल्याण विभागाचे वैद्यकीय सामाजिक अधिकारी भरत चौधरी यांनी आज येथे व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या अखत्यारित असलेल्या शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्रात श्री.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पालक मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री.चौधरी यांनी दिव्यांग अधिनियम 2016 कायद्याची माहिती देऊन दिव्यांग कल्याणकारी 5% राखीव निधी, प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती, याबाबत माहिती दिली. पालकांच्या प्रतिक्रिया, नवीन विद्यार्थ्यांनी दिव्यांग संमिश्र केंद्रात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, देखभाल व्यवस्थापन समिती यांच्याशी चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या पालक मेळाव्यासाठी सुरत, नंदूरबार, चाळीसगाव येथून आलेले पालक उपस्थित होते.

दिव्यांग संमिश्र केंद्र जळगाव वैद्यकीय अधीक्षक डॉ किरण शिरसाठ, प्रवीण भोई, जितेंद्र पाटील आदी यावेळी उपस्थ‍ित होते. कार्यक्रम यशस्व‍ितेसाठी रमजान तडवी, राजेंद्र ठाकूर, श्याम सोनवणे, विलाश पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दत्तात्रय महाजन व आभार गणेश पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button