
सुरक्षिततेचे नियम पाळा; महावितरणचे आवाहन
जळगाव :- शिवजयंतीत्सोव साजरा करताना वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर व सावधगिरी बाळगावी, विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळण्यात यावेत, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी यांच्याकडून करण्यात आले आहे.
शहरासह गावांमध्ये महावितरणच्या उच्च व लघु दाबाच्या विद्युत वाहिन्या, मिनी पिलर, वीजखांब उभारलेले आहेत. अशा ठिकाणी विद्युत वाहिन्यांच्या खाली वा विद्युत यंत्रणेजवळ कार्यक्रम, रॅली, देखावे, फ्लेक्स, छायाचित्रे वा मूर्ती उभारण्यात येऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि आनंदाच्या उत्सवात विद्युत अपघाताचे विघ्न येवू नये, यासाठी सुरक्षितता व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जयंतीनिमित्त कार्यक्रमस्थळी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घेण्यात यावी. ज्या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तेथे महावितरणकडून तात्पुरती अधिकृत वीज जोडणी घ्यावी. विद्युत वाहिनी उंचीनुसार सुरक्षित अंतरावर फ्लेक्स, बोर्ड, ध्वज लावण्यात यावे. जेणेकरून विद्युत वहिनीला वा यंत्रणेला स्पर्श होणार नाही. रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी
विद्युत रोषणाईसाठी सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या वायर खाली झुकलेल्या किंवा विस्कळीत झालेल्या नाहीत, याची तपासणी करून घ्यावी. जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपचा वापर करण्यात यावा. उत्सव काळात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.