
कायद्याची अंमलबजावणी पारदर्शक आणि निपक्षपाती असावी ; एकता संघटनेची मागणी
जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरातील काही घटनांवर चिंता व्यक्त करत जळगाव जिल्हा एकता संघटनेने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी सुव्यवस्था राखताना पारदर्शक आणि निपक्षपातीपणे काम करावे, अशी मागणी करण्यात आली.
संघटनेने असेही नमूद केले की, हिंसाचार भडकवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या चिथावणीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. इतिहासाचा विपर्यास करून समाजात वारंवार अशांतता पसरवण्याचे आणि जातीय मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
शहरातील एका प्रार्थनास्थळी तलवार घेऊन हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, त्याची हिस्टरीशीट तयार करून त्याच्यावर यूएपीए किंवा मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी, असे निवेदन संघटनेने पोलिसांना सादर केले.
संघटनेने आणखी एका प्रकरणात एका गरीब शेतकऱ्याच्या गायी चोरण्यात आल्या असून, पोलिसांनी अद्याप योग्य कारवाई केली नाही, असा आरोप केला. या प्रकारामुळे समाज माध्यमांवर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली.
संघटनेच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या कागदपत्रे, व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आश्वासन दिले.
या वेळी फिर्यादी सलीम घासी खान, रईस पिंजारी, तसेच सलीम खान, वहाब खान, समशेर खान, समीर खाटीक, समीर खान, बशीर पिंजारी, मेहमूद पिंजारी, अख्तर पिंजारी यांची उपस्थिती होती. एकता संघटनेच्या वतीने हाफिज रहीम पटेल, फारुक शेख, नदीम मलिक, सय्यद चांद, आरिफ देशमुख, मौलाना रहीम पटेल, अनिस शहा, अन्वर खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.