
खुनाच्या वादातून तुकाराम वाडी येथे घरांवर मध्यरात्री हल्ला ; ६ संशयित ताब्यात
जळगाव: तुकारामवाडी परिसरात बुधवारी (१४ मे २०२५) मध्यरात्री २:३० ते ३:०० च्या सुमारास ३ घरांवर पाटा, वरवंटा, कुंड्या आणि शस्त्रांनी हल्ला करत दुचाकींची तोडफोड करण्यात आली. सुरेश ओतारी खुनाच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. यामुळे परिसरात अर्धा तास तणावाचे वातावरण होते. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून ६ संशयितांना गुरुवारी (१५ मे २०२५) दुपारी ताब्यात घेतले आहे.
शारदा ठाकुर (वय ४०) यांच्या तक्रारीनुसार, संशयित स्वप्निल उर्फ गोलू ठाकुर, निशांत चौधरी, अरुण उर्फ टीनू गोसावी, रतिलाल उर्फ मुन्ना पहेलवान, पारस सोनवणे, बेंडा अज्या, गौरव मिस्तरी आणि ५-६ अन्य तरुणांनी मध्यरात्री हल्ला केला.
शारदा यांच्या घरी त्या पती सुकलाल आणि दोन मुलींसह झोपल्या असताना हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या आणि दगडफेक करत दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. स्वप्निल ठाकुर आणि त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ करत दुचाकींची तोडफोड केली. यानंतर कल्पना बाविस्कर यांच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसून शिवीगाळ आणि तोडफोड केली.
तसेच, सम्राट कॉलनीतील सविता महाजन यांच्या घराच्या खिडकीची काच फोडली.
हल्ल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, किरण पाटील, राहुल घेटे, नितीन ठाकूर आणि गणेश ठाकरे यांना घटनास्थळी पाठवले. पथकाने अरुण गोसावी (वय ५२, रा. निसर्ग कॉलनी), रतिलाल उर्फ मुन्ना पहेलवान (वय ३२, रा. हरिओम नगर), राजू सोनवणे (वय २५, रा. वाल्मिक नगर), निशांत चौधरी (वय २०, रा. शंकरराव नगर), गौरव अवटाळे (वय १९, रा. शंकरराव नगर) आणि प्रताप पाटील (वय १९, रा. आहुज नगर) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.