
चमगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या : पीक न आल्याने घेतला टोकाचा निर्णय
धरणगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील चमगाव येथील धनराज योगराज सावंत (वय ४९) या शेतकऱ्याने शेतात पीक न आल्याच्या नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
१९ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या शेतातील कांदा चाळीजवळ विषारी कीटकनाशक सेवन केल्याचे निदर्शनास आले. तातडीने त्यांना जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. पीक हातून गेल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.