
अमृत भारत योजनेतून भुसावळ विभागातील पाच स्थानकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
जळगाव | प्रतिनिधी देशभरातील 103 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकसनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेतून दिनांक 22 मे 2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण करण्यात आले. या महत्त्वाकांक्षी योजनेत भुसावळ विभागातील सावदा, मुर्तीजापुर, धुळे, लासलगाव आणि देवळाली या पाच स्थानकांचा समावेश आहे.
या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, आधुनिक तिकीट खिडक्या, हायमास्ट लाइट्स, वातानुकूलित प्रतीक्षालये, डिजिटल डिस्प्ले, कोच इंडिकेशन प्रणाली, स्वच्छतागृहे तसेच दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी सुलभ रॅम्प व लिफ्ट-एस्केलेटर आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रेल्वे स्थानकांचे केवळ प्रवासाचे केंद्र न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचे केंद्र म्हणून रूपांतर करण्याच्या दृष्टीने स्थानक परिसरात विविध उपक्रम, कार्यक्रम राबवले जात आहेत. स्थानकांचा विकास हा स्थानिक गरजा, प्रवासी संख्या आणि शहराच्या वाढत्या गरजांनुसार मास्टर प्लॅनच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
या लोकार्पणप्रसंगी सावदा येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तसेच रेल्वेचे भुसावळ विभागीय प्रबंधक इति पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात शासकीय अधिकारी, स्वतंत्रता संग्रामातील सहभागी, विविध शाळांमधील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, रेल्वे सल्लागार समित्यांचे सदस्य, बँक व टपाल विभागाचे अधिकारी यांनी सहभाग नोंदवला. स्थानकांवरील शाळांमध्ये निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाच्या समारोपाला पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील नागरिकांशी संवाद साधत ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेमागील उद्दिष्टे स्पष्ट करत देशाच्या प्रगतीत या योजनेचे महत्त्व अधोरेखित केले.