
बालिकांच्या सशक्तीकरणासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा – सीईओ मिनल करनवाल
जळगाव (प्रतिनिधी) – “कोणताही देश तेव्हाच विकसित होतो, जेव्हा त्याचे भविष्य शिक्षित आणि सक्षम होते. बालिका पंचायत उपक्रम ग्रामीण भागातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळेत त्या मार्गदर्शन करत होत्या. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणेही उपस्थित होते.
बालिका पंचायत उपक्रमाचे स्वरूप
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘बालिका पंचायत’ उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील ११ ते २१ वयोगटातील मुलींना नेतृत्वगुण, सामाजिक भान आणि लोकशाही प्रक्रियेची ओळख करून देणे हा आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पाच मुलींची निवड करून त्यामधून एक सरपंच आणि एक सचिव नियुक्त केला जाणार आहे.
या उपक्रमाद्वारे बालविवाह, हुंडा प्रथा, मद्यपान यांसारख्या सामाजिक समस्यांबाबत जनजागृती, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यासारख्या विषयांवर कार्य केले जाणार आहे. तसेच, बालिकांना ग्रामपंचायतीसाठी ठराव मांडण्याची संधी दिली जाईल. ग्रामपंचायतींनी त्या ठरावांवर कृती केल्यास संबंधित बालिका पंचायतला जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहेत.
सरपंचांशी थेट संवाद व प्रेरणा
कार्यशाळेदरम्यान करनवाल यांनी सरपंचांमध्ये थेट मिसळत त्यांच्याशी संवाद साधला. विविध गावांमध्ये मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली आणि बालिका पंचायत उपक्रमात अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन केले.
यावेळी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेतील लाभार्थ्यांना ठेव पावत्यांचे वितरणही करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक सरपंच या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.