धरणगावात तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात शोककळा

धरणगावात तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात शोककळा
धरणगाव l प्रतिनिधी l २७ मे २०२५l शहरातील रामलीला चौक परिसरात राहणाऱ्या गिरीष सुकदेव माळी (वय ३५) या तरुण शेतकऱ्याने मंगळवारी (२७ मे) दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.प्राप्त माहितीनुसार, गिरीष माळी आपली पत्नी कविताबाई, आई आशाबाई, वडील सुकदेव माळी आणि दोन मुले मयुरेश (वय १२) व कार्तिकी (वय ९) यांच्यासह राहत होता. गिरीष आणि त्याचा भाऊ स्वप्नील मिळून धरणगाव शिवारातील गट क्रमांक ६६ मधील शेतात शेती करत होते.मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दोघेही भेंडी तोडण्यासाठी शेतात गेले होते.
दुपारी १ वाजता गिरीषने “पाणी पिऊन येतो” असे सांगून विहिरीकडे गेला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने स्वप्नीलने शोधाशोध केली असता गिरीष विहिरीजवळील झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शेजारील शेतकरी कडू रुपा महाजन, गिरधर संखाराम महाजन आणि चुलत भाऊ विजय महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सर्वांनी मिळून गिरीषला खाली उतरवले आणि खासगी ॲम्बुलन्सने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेची नोंद धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. गिरीषने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.