कर्जबाजारीपणा आणि नापिकीने युवा शेतकऱ्याची आत्महत्या; दु:खाचा डोंगर कोसळून वडिलांचा मृत्यू, आईला हृदयविकाराचा झटका

कर्जबाजारीपणा आणि नापिकीने युवा शेतकऱ्याची आत्महत्या; दु:खाचा डोंगर कोसळून वडिलांचा मृत्यू, आईला हृदयविकाराचा झटका
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत या गावात ह्रदयद्रावक घटना घडली असून कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे अवघ्या २७ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. या दु:खद घटनेचा धक्का सहन न झाल्याने वडिलांचा मृत्यू झाला, तर आईला हृदयविकाराचा झटका आला आहे.
राहुल भीमराव बेदरे (वय २७) हा कुटुंबाचा आधारवड होता. वडील आजारी आणि अंथरुणाला खिळलेले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी राहुल शेती आणि मजुरी करत होता. मात्र, साडेतीन एकर कोरडवाहू शेतात नापिकी आणि त्यावर असलेले बँकेचे कर्ज यामुळे राहुल नैराश्यात गेला. अखेर १० जून रोजी त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.
मुलाच्या मृत्यूच्या आघाताने वडील भीमराव बेदरे (वय ५८) यांचा दोन दिवसांतच १२ जून रोजी मृत्यू झाला. तर, या दुहेरी आघाताने आई शोभाबाई बेदरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सिंचनाचा अभाव आणि सरकारी दुर्लक्षाचा बळी
सावरगाव नसरत परिसरात सिंचनाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने संपूर्ण शेती कोरडवाहू आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती, पावसाअभावी नापिकी आणि कर्जाचा डोंगर अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. बेदरे कुटुंबावर ओढवलेली ही घटना हे त्याचे विदारक उदाहरण ठरत आहे.
गावकऱ्यांनी या घटनेनंतर पुढाकार घेत पीडित कुटुंबाला मानसिक आधार दिला आहे. मात्र, ग्रामस्थांकडून शासनाकडे जोरदार मागणी होत आहे की, बेदरे कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, तसेच धोंड प्रकल्पातून सावरगाव परिसरात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडवावा.
फक्त घोषणा नव्हे, तर कृतीची गरज
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या जात असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी अपुरी ठरत असल्याचा आरोप होत आहे. बेदरे कुटुंबावर ओढवलेले हे दुःख केवळ एक घटनेपुरते मर्यादित नसून राज्यातील शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत केवळ आश्वासने नव्हे, तर ठोस कृती करत शेतकऱ्यांच्या जीवनात खरंच दिलासा आणावा, अशी मागणी सर्वत्र होत आहे.