१३ वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून क्रूर हत्या; नरबळीचा संशय, रिंगणगावात खळबळ

१३ वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून क्रूर हत्या; नरबळीचा संशय, रिंगणगावात खळबळ
एरंडोल (प्रतिनिधी):
जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने खळबळ माजली आहे. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय मुलाची गळा चिरून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. तेजस गजानन महाजन (वय १३) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, हत्येमागे नरबळीचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत तपास तीव्र केला आहे.
दुकान बंद केल्यानंतर बेपत्ता; रात्रभर शोध
तेजस आपल्या कुटुंबासह रिंगणगावात राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन शेतीसह कृषी केंद्र चालवतात. सोमवारी (१६ जून) गजानन यांनी तेजसला दुकानावर ठेवून जळगावला कामासाठी गेले होते. संध्याकाळी दुकान बंद करून तेजस घरी येईल, अशी अपेक्षा होती; परंतु तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी रात्रभर शोध घेतला. याबाबत एरंडोल पोलिसांत तक्रार दाखल झाली
.खर्ची शिवारात मृतदेह आढळला
मंगळवारी पहाटे खर्ची गावाजवळील निंबाळकरांच्या शेतात तेजसचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ग्रामस्थांनी पोलिसांना कळवताच, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी तपास केला. मृतदेह तेजसचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे
.नरबळीचा संशय; तिघे ताब्यात
या हत्येमागे अंधश्रद्धेतून नरबळीचा संशय पोलिसांना आहे. तिघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हत्या कोणत्या कारणाने आणि कोणाच्या सांगण्यावरून झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
जिल्ह्यात भीतीचे वातावरण
या क्रूर हत्येने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये दहशत आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, लवकरच खटल्यातील सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे.