
चाळीसगाव: पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा धरणातील पाणीसाठा आज, ४ सप्टेंबर रोजी ९६.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रकल्पात पाण्याची वाढती आवक लक्षात घेता, धरणाचे एक वक्रद्वार उघडून गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी २ वाजता धरणाचे वक्रद्वार क्रमांक १ उघडण्यात आले असून, त्यातून ८१४ क्युसेक्स (२३.०३ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक आणखी वाढल्यास विसर्गाचे प्रमाण वाढवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर, पाटबंधारे विभागाने गिरणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी आपली पशुधन, शेतीची उपकरणे आणि इतर वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. तसेच, संबंधित शासकीय यंत्रणांनाही आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





