
लग्नाआधीच तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..!
जळगाव तालुक्यातील वाकडी येथील दुर्दैवी घटना
जळगाव (प्रतिनिधी): अवघ्या आठवड्याभरात नंतर लग्न होणार असलेल्या एका 21 वर्षे तरुण शेतकऱ्याने जळगाव तालुक्यातील वाकडी गावात शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी, १३ मे २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव अमोल वाल्मीक पाटील (वय २१, रा. वाकडी, ता. जळगाव) असे असून तो आपल्या आई-वडील व दोन भावांसह वास्तव्यास होता. वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अमोल देखील शेतीच्या कामात वडिलांना मदत करायचा.अमोल यांचे खामखेडा, ता. मुक्ताईनगर येथील मुलीशी लग्न ठरले. २० मे रोजी हळद व २१ मे रोजी लग्न असल्याने घरात तशी तयारीदेखील सुरू होती.
सोमवारी रात्री, १२ मे रोजी, जेवणानंतर अमोल शेताकडे गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. मंगळवारी सकाळी गावकऱ्यांना त्याच्या शेतालगत असलेल्या दुसऱ्या शेतात कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. तातडीने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या अचानक झालेल्या घटनेने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आई-वडील व नातेवाइकांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.