
7,235 हेक्टरवरील पिकांचे नुकसान; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील
■ 12 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फटका | 588 गावांतील शिवार बाधित
■ नुकसान झाल्यास 72 तासांत पीक विमा कंपनीच्या 14447 टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी
जळगाव – जिल्ह्यात 6 व 7 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने व वादळाने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान केले आहे. सुमारे 7 हजार 235 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 588 गावांतील 12 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी जळगाव व चोपडा तालुक्यातील वादळग्रस्त भागांचा दौरा करत शेतकऱ्यांना धीर दिला. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पाहणी दौऱ्यात आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तातडीने पंचनामे व मदतीसाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक
पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत नुकसान भरपाईची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यांनी स्पष्ट केले की, मागील वर्षी 360 कोटींपैकी तब्बल 60 कोटींची मदत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न दिल्यामुळे अडकली होती. यंदा असे होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विमा नोंदणी, फोटो, ई-मेलद्वारे माहिती द्या
पीक विमा योजनेत नुकसान दाखल करण्यासाठी 72 तासांच्या आत 14447 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवावी. यासोबतच, जिओ टॅग केलेले नुकसानाचे फोटो ई-मेलद्वारे विमा कंपनीला पाठवण्याचेही आवाहन करण्यात आले.
महावितरणला विहित मुदतीत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश
वादळामुळे पडलेले डीपी, खांब व तुटलेल्या तारा यांची दुरुस्ती शुक्रवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत.
शेतकरी आजीचे अश्रू पुसले…
भादली (खु.) येथील शेतकरी भगवान पाटील यांच्या केळीच्या बागेचे नुकसान पाहून त्यांची वृद्ध आई हिराबाई पाटील हळहळून रडू लागल्या. तेव्हा पालकमंत्री पाटील यांनी स्वतः पुढे येत त्यांच्या अश्रूंना हात लावला आणि धीर दिला. हे दृश्य शासनाच्या संवेदनशीलतेचे प्रतीक ठरले.
जखमी शेतकरी महिलेसाठी त्वरित उपचाराचे निर्देश
नांद्रा खु. येथील भागाबाई पाटील या महिलेला वादळात गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर तत्काळ उपचार व्हावेत यासाठी पालकमंत्र्यांनी वैद्यकीय अधिष्ठात्यांशी संपर्क साधून न्युरो सर्जन उपलब्ध करून देण्यास सांगितले. आवश्यक खर्च शासनाच्या मदतीतून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दौऱ्यातील गावांची यादी:
भादली (खु.), कठोरा, किनोद, सावखेडा (खु.), करंज (ता. जळगाव) आणि धानोरा (ता. चोपडा)