खान्देशजळगांवशासकीयसामाजिक

जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करनवाल यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम; तालुकास्तरावर तक्रार निवारण दिन

जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करनवाल यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम; तालुकास्तरावर तक्रार निवारण दिन

जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेशी संबंधित कार्यालयांत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या तक्रारी आणि नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना वारंवार माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांमुळे होणारा त्रास आता संपणार आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मीनल करनवाल यांनी एका नाविन्यपूर्ण संकल्पनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी तालुकास्तरावर तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे प्रशासन थेट नागरिकांच्या दारी पोहोचणार असून, सर्व प्रकारच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण होणार आहे.

मीनल करनवाल या नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून जळगाव जिल्हा परिषदेत नव्याने रुजू झाल्या आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथम सर्व विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या लक्षात आले की, अनेक तक्रारी आणि प्रशासकीय प्रकरणे बराच काळ प्रलंबित आहेत. यामुळे सामान्य नागरिक आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात आणि त्यातून त्यांचा बराच वेळ वाया जातो. या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी तालुकास्तरावर तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

या उपक्रमांतर्गत, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी मीनल करनवाल स्वतः आणि जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या तक्रार निवारण दिनादरम्यान प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रशासकीय तक्रारींवर सविस्तर चर्चा करून त्यांचे तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे. यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारी आणि समस्यांचे जलदगतीने निराकरण होईल, अशी अपेक्षा आहे.

या अभिनव उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज भासणार नाही. तसेच, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता येण्यास मदत होईल. “प्रशासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा हा एक प्रयत्न आहे, असे मीनल करनवाल यांनी सांगितले. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीतून जळगाव जिल्हा परिषदेच्या कामकाजात आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button