जळगांव

BREAKING : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तापमानाचा कहर, देशात प्रथम!

खान्देश टाइम्स न्यूज l २१ एप्रिल २०२५ l हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. सोमवारी, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला होता. विदर्भातील अकोला आणि नागपूर शहरांचाही यात समावेश होता. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

विदर्भात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे, जिथे सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. विदर्भातील अनेक शहरांचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असून, देशातील सर्वाधिक तापमान नोंदवणारे प्रदेश म्हणून विदर्भाची ओळख झाली आहे. आता तर चंद्रपूरची जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद झाली आहे.

काल, रविवारी चंद्रपूर शहराचे तापमान उच्चांक गाठत ४४.६ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. या वाढलेल्या तापमानामुळे चंद्रपूर शहरात दुपारी संचारबंदीसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपुरात रात्रीच्या वेळी देखील उच्च तापमानाची नोंद झाली आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून, तापमान ४४ अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. हवामान विभागाने या संदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे, ज्यामुळे चंद्रपूरच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी, विशेषत: बारा ते चार या वेळेत शहरातील रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य दिसत आहेत. नागरिक स्वतःला उन्हाच्या तीव्रतेपासून वाचवण्यासाठी टोपी, स्कार्फ आणि गॉगलचा वापर करत आहेत. वाढत्या तापमानाची जाणीव करून देण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. या फलकांद्वारे पुढील काही दिवस तापमान उच्च राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २२ आणि २३ एप्रिल रोजी विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या विदर्भातील अनेक शहरांचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या वर नोंदले गेले आहे.
आज विदर्भातील प्रमुख शहरांचे तापमान खालीलप्रमाणे आहे: अकोला (४४.३°C), अमरावती (४४.४°C), बुलढाणा (३९.६°C), ब्रह्मपुरी (४४.४°C), चंद्रपूर (४४.६°C), गडचिरोली (४२.६°C), गोंदिया (४२.२°C), नागपूर (४४.०°C), वर्धा (४४.०°C), वाशीम (४२.६°C), आणि यवतमाळ (४३.६°C).
दरम्यान, नाशिकमधील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. शहराच्या कमाल तापमानात दोन अंशांची घट झाली आहे. मात्र, हवामानात उष्णता आणि दमटपणा कायम असल्याने शहरवासीय अजूनही त्रस्त आहेत. १८ एप्रिलच्या तुलनेत आज नाशिकच्या कमाल तापमानात दोन अंशांची घट नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा अजूनही ४३°C च्या वर आहे.

पाऊसाचाही अंदाज :
राज्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच, काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस येण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेसोबतच पावसाच्या शक्यतेमुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button