खान्देशजळगांवसामाजिक

जळगाव शहरात दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांची मोठी तारांबळ

जळगाव शहरात दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांची मोठी तारांबळ

जळगाव | प्रतिनिधी – जळगाव शहरात आज (दि. ३ मे) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल झाला. सुरुवातीला वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला आणि त्यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अचानक झालेल्या बदलामुळे शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

गोलानी मार्केट, फुले मार्केट, सुभाष चौक, टावर चौक आदी प्रमुख व्यापारी भागांमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे दुकाने झाकण्याची लगबग सुरू झाली. काही भागांमध्ये वाऱ्यामुळे झाडांची आणि फेरीवाल्यांच्या छपरांचीही हानी झाली. सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

हवामान विभागाने यापूर्वीच जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता आणि तो खरा ठरला. शहराच्या काही भागांमध्ये गारपीटही झाल्याचे वृत्त आहे. सुमारे १५ ते २० मिनिटांचा हा पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला, जो उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी काहीसा दिलासादायक ठरला.

मात्र या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर संकट कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः उन्हाळी पिके व भाजीपाला यांचे नुकसान होण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून संभाव्य नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button