
आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय: सर्व रजा रद्द, अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ हजर राहण्याचे आदेश
जळगाव | प्रतिनिधी जिल्ह्यात उद्भवू शकणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निर्णायक पाऊल उचलत सर्व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. यासोबतच सर्वांना तत्काळ आपल्या कार्यस्थळी हजर राहण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.हा आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत कलम 30(2)(iv), 30(2)(xvi) आणि 34(a) अन्वये जारी करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या अधिकारांचा वापर करत 9 मे 2025 पासून पुढील आदेशापर्यंत सर्व पूर्वमंजूर रजा रद्द केल्या आहेत.सध्या रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणताही कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय रजेवर जाणार नाही किंवा मुख्यालय सोडणार नाही, असे स्पष्ट निर्देश आहेत.संबंधित विभागप्रमुखांनी या आदेशाची कठोर अंमलबजावणी करावी आणि अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही सांगण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत कडक शिस्तभंगाची कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.