गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असलेला तरुण बाजार समितीच्या छतावर मृतावस्थेत आढळला

गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असलेला तरुण बाजार समितीच्या छतावर मृतावस्थेत आढळला
जळगाव, प्रतिनिधी मास्टर कॉलनीतील अरबाज शेख (वय १६) या गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीच्या छतावर विजेच्या वायरींमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मुलाचा मृतदेह समोर आल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळाला.
अरबाज शेख हा ८ मे रोजी रात्री कबूतर पकडण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र, उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या आईने शोधाशोध सुरू केली. मुलाचा काहीही ठावठिकाणा लागला नाही म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुलाचा शोध घेण्यासाठी त्याची आई मुंबईपर्यंत जाऊन आली होती.
दरम्यान, बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट इमारतीच्या छतावर एक कर्मचारी पाण्याची टाकी तपासण्यासाठी गेला असता, दुर्गंधी येत असल्याने त्याने चौकशी केली. त्यावेळी विजेच्या वायरींमध्ये गुंडाळलेला मृतदेह दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हरविलेल्या अरबाजचे आजोबा घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी त्याच्या अंगावरील शर्टवरून ओळख पटवली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला असून, प्राथमिक अंदाजानुसार कबूतर पकडण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.