
जळगावात ६३ कोटींच्या मोबदल्यासाठी बनावटगिरीचा ‘मास्टरप्लॅन’
वकील आणि १७ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल!
जळगाव: जिल्ह्यात जमिनीच्या मोबदल्यासाठी सरकारी यंत्रणेचीच दिशाभूल करण्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपळगाव बुद्रूक आणि अटलगव्हाण येथील पाझर तलावासाठी संपादित जमिनीचा चक्क ६३ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला लाटण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जळगावचे वकील अॅड. किशोर बाबुराव पाटील यांच्यासह १७ संशयितांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
बनावट लेटरहेड आणि शिक्क्यांचा वापर
विशेष भूसंपादन अधिकारी जयश्री माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयितांनी जमिनीचा वाढीव मोबदला मिळवण्यासाठी चक्क विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि इतर अधिकृत कागदपत्रांचा वापर केला. इतकेच नाही तर, ज्या फळझाडांची नोंद मूळ निवाड्यात नव्हती, ती झाडे कागदोपत्री दाखवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाला. चौकशी अहवाल आणि स्थळ निरीक्षण नोंदवहीमध्ये काळ्या पेनाने ५० आंब्याची झाडे बेकायदेशीररित्या वाढवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
तपासात धक्कादायक बाबी समोर
या प्रकरणातील सस्पेन्स तेव्हा वाढला जेव्हा मूळ मोजणीत नसलेली झाडे अचानक कागदपत्रांमध्ये दिसू लागली. या बनावट नोंदींच्या आधारे ६३ कोटी रुपयांचा दावा न्यायालयात दाखल करण्यात आला होता. विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, हा सर्व प्रकार बनावट कागदपत्रांच्या आधारे केल्याचे उघड झाले. रविवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती.
यांच्याविरुद्ध झाला गुन्हा दाखल
या प्रकरणात जिल्हापेठ पोलिसांनी अॅड. किशोर बाबुराव पाटील (जळगाव), भगवान माणिक ठाकरे, मिश्रीलाल हिराचंद तेली, गोविंद हिराचंद तेली, प्रकाश हिराचंद तेली, गेंदिलाल हिराचंद तेली, चंद्राबाई लक्ष्मण तेली, सुमनबाई नारायण तेली, सीताराम शिवलाल तेली, गंगीलाल हिराचंद तेली, चिंधाबाई हिराचंद तेली, नामदेव नारायण तेली, हिराचंद नारायण तेली, शहादू नारायण तेली, शिवलाल नारायण तेली, रवींद्र मधुकर नाईक आणि ईश्वर रघुनाथ पाटील (सर्व रा. पिंपळगाव बु., ता. पाचोरा) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या घोटाळ्याचे धागेदोरे आणखी कुठे पसरले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या मोठ्या कारवाईमुळे महसूल आणि पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेची चर्चा होत असून, चुकीच्या मार्गाने मोबदला मिळवू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.





