
पासपोर्ट हा नागरिकत्वाचा नव्हे तर प्रवासाचा दस्तऐवज; ई-पासपोर्टमुळे फसवणुकीला आळा
नवी दिल्ली : पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नसून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचा अधिकृत दस्तऐवज आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नव्या चिप-आधारित ई-पासपोर्टमध्ये बायोमेट्रिक माहितीचा समावेश करण्यात आल्याने जागतिक स्तरावर त्याची स्वीकारार्हता वाढण्यास तसेच फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२४ जून रोजी साजऱ्या करण्यात आलेल्या ‘पासपोर्ट सेवा दिवस’ निमित्त आयोजित कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. १९६७ मध्ये पासपोर्ट कायदा लागू झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस पाळला जातो.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पासपोर्ट हा भारतीय नागरिक परदेशात असताना त्याचे राष्ट्रीयत्व प्रमाणित करणारा दस्तऐवज आहे. पासपोर्ट जारी करण्यापूर्वी विविध शासकीय यंत्रणांकडून सखोल पडताळणी केली जाते आणि त्यानंतरच तो प्रदान केला जातो.
पासपोर्ट सेवा कार्यक्रमाच्या आधुनिकीकरणाचा भाग म्हणून गेल्या वर्षापासून चिप-आधारित ई-पासपोर्ट जारी करण्यात येत आहेत. आतापर्यंत देशभरात सुमारे १ कोटी ४७ लाख ई-पासपोर्ट जारी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ई-पासपोर्टमध्ये अंतर्भूत अँटेना आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) चिप बसविण्यात आली आहे. या चिपमध्ये धारकाची वैयक्तिक माहिती आणि बायोमेट्रिक तपशील सुरक्षित स्वरूपात साठविले जातात. त्यामुळे पासपोर्टची सुरक्षितता वाढून बनावट कागदपत्रांचा धोका कमी होण्यास मदत होत आहे.
दरम्यान, कायदेशीर स्थलांतराच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि परदेशी नियोक्ते व परदेशात नोकरी शोधणारे भारतीय नागरिक यांच्यात संपर्क वाढविण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय पुढील आठवड्यात दोन दिवसीय ‘ह्युमन रिसोर्स मोबिलिटी फोरम’ आयोजित करणार आहे.




