
औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद
अत्यावश्यक औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे आवाहन
जळगाव: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार, विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. २० मे २०२६ रोजी देशभरातील ठोक व किरकोळ औषध विक्री व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या देशव्यापी बंदचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही जाणवण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जरी खासगी दुकाने बंद असली तरी आपत्कालीन सेवा, शासकीय रुग्णालये आणि काही निवडक औषध दुकाने सुरू राहतील. औषधे ही ‘अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५’ अंतर्गत येत असल्याने पुरवठा खंडित करणे कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, असा इशाराही सहायक आयुक्तांनी दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध न झाल्यास नागरिकांनी डॉ. प्र. भा. अस्वार (९४२२३५६१४३) किंवा श्रीमती क. र. पाटील (९८६०१७२५६१) यांच्याशी संपर्क साधावा.





