
नाला खोलीकरण म्हणजे शेतकऱ्याच्या उद्याची पाण्याची खात्री – शेतीला दिलेलं जिवंत पाण्याचं वरदान -पालकमंत्री गुलाबराव पाटील
धरणगावातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जलक्रांतीची हाक; ‘राज्यासाठी आदर्श मॉडेल
जळगाव प्रतिनिधी “नाला खोलीकरण म्हणजे शेतकऱ्याच्या उद्याची पाण्याची खात्री… शेतीला दिलेलं जिवंत पाण्याचं वरदान असून पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, कारण आज जे पाणी वाहून जातं, तेच उद्या दुष्काळ बनून गावाच्या दारात उभं राहतं,” अशा अत्यंत भावनिक आणि ठाम शब्दांत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यात सुरू असलेल्या ऐतिहासिक नाला खोलीकरण मोहिमेचं महत्त्व अधोरेखित केलं.
नाल्यातील गाळ म्हणजे काळ्या आईचं सोनं” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
पाहणी दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “आज परिस्थिती अशी आहे की पाऊस पडतो, पण पाणी वाहून जातं. उन्हाळा आला की विहिरी, बोअर कोरड्या पडतात. यंदा भूजल पातळी तब्बल साडेतीन मीटरने खाली गेली आहे. पुढच्या काही वर्षांत संपूर्ण जळगाव जिल्हा डार्क झोनमध्ये जाण्याचा धोका आहे. त्यामुळे नाला खोलीकरण ही आता केवळ योजना नाही, तर काळाची गरज बनली आहे. नाल्यातील गाळ हा काळ्या आईचं सोनं आहे. तो शेतात गेला की जमिनीची सुपीकता वाढते, पाणी मुरतं, विहिरी जिवंत राहतात आणि शेतकऱ्याला उन्हाळ्यातही आधार मिळतो. धरणगावात सुरू असलेली ३१० किलो मीटरची नाला खोलीकरण मोहीम ही भविष्यातील पाणी संकटाविरुद्धची लोकचळवळ आहे.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की, “नाला खोलीकरणाची ही व्यापक जलचळवळ शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून राबवली जात आहे. शेतकरी हित हा या संपूर्ण मोहिमेचा केंद्रबिंदू आहे. भूजल पातळीत वाढ झाली तर त्याचा सर्वात मोठा फायदा शेतीला आणि पिण्याच्या पाण्याला होणार आहे. भविष्यात शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही पाण्याची उपलब्धता राहावी, गावोगावी विहिरी जिवंत राहाव्यात आणि पाण्याची टंचाई दूर व्हावी, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.
शेतकऱ्यांना आवाहन करताना पालकमंत्री म्हणाले की, या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे १४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा निधी पूर्णतः CSR माध्यमातून उभारण्यात येत आहे. GPS ग्रुप, जैन इरिगेशन आणि मेघा इंजीनियरिंग तसेच विविध संस्थांच्या सहकार्याने प्रशासन व लोकसहभागाच्या माध्यमातून ही जलचळवळ आकार घेत आहे.
गावाने गावासाठी उभं राहिलं पाहिजे. आम्ही आर्थिक मदत मागत नाही, पण कामासाठी साथ द्या. जेसीबी आला तर जागा द्या, गाळ काढण्यासाठी सहकार्य करा. शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रशासन एकत्र आले तर भविष्यातील पाण्याचं संकट दूर होण्यास मोठी मदत होईल,” असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धार, शेरी, पथराड आणि लाडली परिसरातील नाला खोलीकरण व नदीपात्र रुंदीकरण कामांची पाहणी करताना त्यांनी केवळ कामांचा आढावा घेतला नाही, तर भविष्यातील पाणी संकटावर थेट भाष्य करत संपूर्ण जिल्ह्यासाठी जलसंवर्धनाची नवी दिशा दिली.
*यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, शाखा अभियंता राहुल मिटकरी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“धरणगावचा प्रयोग राज्यासाठी आदर्श ठरेल” – जिल्हाधिकारी रोहन घुगे
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, नाला खोलीकरण आणि रुंदीकरणामुळे भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार असून भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हा उपक्रम केवळ नाला खोलीकरणापुरता मर्यादित नाही, तर भविष्यातील जलसुरक्षेचा व्यापक आराखडा आहे. भूजल पातळी वाढवणे, शेतीसाठी शाश्वत पाणीसाठा निर्माण करणे आणि दुष्काळी परिस्थिती टाळणे या दृष्टीने हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत दूरदृष्टीने हा विषय हाती घेतला आहे. प्रशासन, CSR संस्था आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित सहभागातून धरणगाव तालुक्यात सुरू झालेली ही मोहीम भविष्यात संपूर्ण राज्यासाठी आदर्श मॉडेल ठरू शकते,” असे ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले.
पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी व भूमिपूजन
नाला क्रमांक १४ पथराड–शेरी–धार–
खामखेडा ते झिरी नदीपर्यंतच्या १० किलोमीटर नाला खोलीकरणाची तसेच नाला क्रमांक १५ मधील शेरी परिसरातील ३ किलोमीटरच्या नाला खोलीकरणाची पाहणी करण्यात आली. तसेच धार–चांदसर या शेत रस्त्याचे लोकार्पणही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शेरी.जवळील सुधाकर पाटील यांच्या शेताजवळ २० लाख रुपये खर्चाच्या साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजनदेखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
३१० किलोमीटर नाले खोलीकरणाचा निर्धार
पाळधी–चांदसर भागापासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत धरणगाव तालुक्यात जवळपास ३१० किलोमीटर नाले आणि नदीपात्रांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या दीड महिन्यात ३५ किलोमीटरपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पासाठी देशातील मोठ्या नदीजोड प्रकल्पांवर काम केलेल्या यश इंजिनिअरिंग कन्सल्टन्सीमार्फत अत्याधुनिक तांत्रिक सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक नाल्याचा नैसर्गिक उतार, जलप्रवाह आणि साठवण क्षमता लक्षात घेऊन नियोजनबद्ध काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, तालुका कृषी अधिकारी, पदाधिकारी, आजी – माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक सरपंच, प्रगतशील शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





