नशिराबाद पंचक्रोशीत गुणवंतांचा जल्लोष; स्वयंशोध फाउंडेशनतर्फे ९० विद्यार्थ्यांचा गौरव

नशिराबाद पंचक्रोशीत गुणवंतांचा जल्लोष; स्वयंशोध फाउंडेशनतर्फे ९० विद्यार्थ्यांचा गौरव
मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्हांचे वितरण; उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
नशिराबाद | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने स्वयंशोध फाउंडेशनतर्फे इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात नशिराबाद पंचक्रोशीतील सुमारे ९० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हिजन अकॅडमीचे संचालक अनिल माला हे होते. तर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा तथा निंभोरा गाव सेवा समितीच्या युवा संयोजिका भाग्यश्री ठाकरे आणि ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या वृषाली महाजन या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी नशिराबादसह मन्यारखेडा, कळगाव, जळगाव खुर्द, सुनसगाव आणि कडगाव परिसरातील इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविलेल्या यशाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
सोहळ्याला नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, नगरसेवक चेतन बऱ्हाटे, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चव्हाण, मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, मनोज नाले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंशोध फाउंडेशनचे सचिव धीरज सैतवाल यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन राजू पासपांडे यांनी केले.
दरम्यान, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धीरज सैतवाल, महेश सपकाळे, चेतन सपकाळे, सागर धोबी, विशाल सावळे, आदेश राजपूत आणि स्वयंशोध फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानामुळे परिसरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.





