
शिशधर समाज फाउंडेशनच्या पुढाकारातून साध्या पद्धतीने आदर्श विवाह संपन्न
जळगाव, दि. ६ : शिशधर समाज फाउंडेशन (मन्यार जमात) यांच्या सहकार्याने अत्यंत साध्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या पद्धतीने एक आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाहात कोणत्याही प्रकारचा हुंडा किंवा अनावश्यक खर्च न करता विवाह पार पाडण्यात आला.
मोहम्मद मुनाफ मन्यार (रा. मु. आकोले, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) आणि बुशरा तस्लीम इकबाल मनियार (रा. कुबा नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) हे विवाहबद्ध झाले.
फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीला साखरपुड्यासाठी दोन्ही कुटुंबीय एकत्र आले होते. मात्र, परस्पर संमतीने आणि फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली त्याच कार्यक्रमाचे रूपांतर विवाह सोहळ्यात करण्यात आले. विशेष म्हणजे, या विवाहात वरपक्षाने कोणत्याही प्रकारचा दहेज (हुंडा) स्वीकारला नाही. त्यामुळे समाजात साधेपणा, समानता आणि हुंडामुक्त विवाहाचा आदर्श निर्माण झाला आहे.
हा विवाह यशस्वी करण्यासाठी हाजी अजीज शेख शरीफ (पाली), हाजी खलील सुभान मन्यार (पाली), अब्दुल रहेमान सैय्यद (चाळीसगाव), रईस सुभान मन्यार, जावेद सुभान, तारिक सुभान, अशफाक सुभान, अनसार अजीज मन्यार, फारूक ठेकेदार, रऊफ आसीफ ठेकेदार, तन्वीर सर, एपीए भाई आणि अब्दुल रहेमान भाई यांनी विशेष सहकार्य केले.
समाजात साध्या, खर्चमुक्त आणि हुंडामुक्त विवाहांना प्रोत्साहन मिळावे, असा संदेश या विवाहातून देण्यात आला.




