
खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l वक्फ कायद्याबद्दल जनजागृती करण्यासाठी कॉर्नर सभा आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे माहिती दिली जात आहे, तर येत्या शुक्रवारी धरणे आंदोलन केले जाणार आहे.
संपूर्ण देशभरात वक्फ कायद्यात सुधारणा सुरू असताना त्याला विरोध झाला होता आणि आता हा कायदा लागू झाल्याने विरोधाची धार अधिक तीव्र झाली आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली जळगावात मुफ्ती खालिद, मुफ्ती रमीज, मुफ्ती अबूजर, मौलाना कासिम नदवी, हाफिज रहीम पटेल यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा वक्फ बचाव समितीचे फारुक शेख यांच्या समन्वयाने जळगाव वक्फ बचाव समिती कार्यरत आहे. या समितीच्या माध्यमातून आता महिलाही सक्रिय झाल्या आहेत.
कॉर्नर सभा आणि भेटींद्वारे जनजागृती :
वक्फ म्हणजे काय, नवीन कायद्यामुळे काय नुकसान होणार आहे आणि हा कायदा संविधानाच्या विरोधात कसा आहे, हे शहरातील महिलांना समजावून सांगण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे.
शुक्रवारी धरणे आंदोलन :
आलेमा अशरफुलनीसा, आलेमा नाझिया, आलेमा गुलनाज, निलोफर शेख, डॉ. फरहा वकार, शाहिस्ता शकील आणि हाजरा शेख यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, येत्या २५ एप्रिल, शुक्रवारी सायंकाळी जळगाव शहरात महिला विभागाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.