खान्देशगुन्हेजळगांवशासकीयसामाजिक

रस्ते अपघात टाळणे ही सामूहिक जबाबदारी! – डॉ.महेश्वर रेड्डी

दर्शन फाऊंडेशन, आरोही मोटर्सतर्फे सन्मान सोहळा

रस्ते अपघात टाळणे ही सामूहिक जबाबदारी! – डॉ.महेश्वर रेड्डी

दर्शन फाऊंडेशन, आरोही मोटर्सतर्फे सन्मान सोहळा

जळगाव I प्रतिनिधी
राज्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच असून मुंबई, पूण्यानंतर जळगाव जिल्ह्याचा नंबर या अप्रिय घटनेत आला आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत, त्यात प्राणांतिक अपघातात दुचाकी चालकांचे अपघात जास्त असतात. रस्ते अपघात टाळणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले.

दर्शन फाउंडेशन आणि आरोही मोटर्स या संस्थेतर्फे आयोजित रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ‘सन्मान कर्तृत्वाचा नव्हे दातृत्वाचा’मध्ये ते बोलत होते. यावेळी अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्या पत्रकार, पोलीस, डॉक्टर, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. बुधवार दि.२२ जानेवारी रोजी मानराज पार्क याठिकाणी सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे होते तर प्रमुख अतिथी ज्ञानेश्वर ढेरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प प्रमुख राहुल पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे, मोटर वाहन निरीक्षक विनोद चौधरी, सौरभ पाटील, सुयोग माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.महेश्वर रेड्डी म्हणाले की, वाहतुकीचे नियम पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. केवळ जनजागृती करुन रस्ते अपघात थांबणार नाहीत तर त्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे महत्वाचे आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे झाले आहे. बहुतांश अपघातात दुचाकीस्वार ठार होण्याचे प्रमाण अधिक आहे. दर्शन फाऊंडेशनने सामाजिक जाणीवेतून हा कार्यक्रम आयोजित केल्याने यातून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा देखील डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश अजमेरा यांनी सांगितले की, रोज वेगवेगळ्या रस्त्यांवर अपघात नित्याचे झालेले आहे. वाहतूक नियम व कायदे पाळले तर अपघातांची मालिका खंडीत होण्यास मदत होणार आहे. समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्दात्य भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे, मोटर वाहन निरीक्षक विनोद चौधरी, पत्रकार शुभदा नेवे, अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन तुषार वाघुळदे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष निलेश अजमेरा, उपाध्यक्ष कल्पेश मालपाणी, सचिव अल्पेश न्याती, रोहित चव्हाण, रुपेश अजमेरा, नरेंद्र पाटील, वैभव सोनार यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button