
जळगावात उष्णतेचा प्रकोप; मे महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात सध्या उष्णतेने कहर केला आहे. एप्रिल महिन्यात तापमान ४१ ते ४३ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिर राहिल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच जळगावकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देत आज ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.बुधवारी जळगावात तापमान ४३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यंदाच्या एप्रिल महिन्यात सरासरी तापमान ४२ ते ४३ अंशांदरम्यान राहिले, तर गेल्या वर्षी याच कालावधीत ते ४१ अंश होते. यंदा सरासरी तापमानात १ अंशाची वाढ झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) नोंदींनुसार, यंदाचे सर्वाधिक तापमान ४३.८ अंश सेल्सिअस आहे. १ ते ३ मे दरम्यान तापमान ४३ ते ४४ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज१ मे: तापमान ४३ अंश, उष्ण आणि आर्द्र वातावरण२ मे: तापमान ४३ अंश, निरभ्र आणि कोरडे वातावरण३ मे: तापमान ४४ अंश, निरभ्र आणि कोरडे वातावरण४ मे: तापमान ४२ अंश, सकाळी कोरडे, दुपारनंतर पावसाची शक्यता५ मे: तापमान ४१ अंश, दुपारनंतर गडगडाटासह पाऊसउष्णतेच्या या लाटेमुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि हलके कपडे परिधान करावेत, असे सांगण्यात आले आहे.