
४५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक; दोन आरोपी अद्याप फरार
स्थानिक गुन्हे शाखेची करवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव तालुक्यातील वाघले गावातील गणेश ताराचंद राठोड (वय ४२) यांचे ३० एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून त्यांच्या सुटकेसाठी तब्बल ४५ लाख रुपयांची खंडणी मागितली. पीडितावर अमानुष मारहाण करून त्यांचे व्हिडिओ त्यांच्या मुलाला पाठवत मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्पर कारवाईमुळे केवळ १२ तासांत राठोड यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच गणेश राठोड यांचा मुलगा अनिल राठोड यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेला दिली.
तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या आधारे आरोपी जयेश दत्तात्रय शिंदे (२८, सैनिक कॉलनी, चाळीसगाव) आणि श्रावण भागोरे (स्वामी विवेकानंद कॉलनी, नांदगाव) यांची ओळख पटली. आरोपी मनमाड रेल्वे स्थानकाच्या दिशेने मोटारसायकलवर जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. शेतात ५ किमी धावपळीनंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्यांनी अपहरणाची कबुली दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, राजू पाटील (डोंबिवली) आणि सोनू (मुंबई) यांच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला होता. पीडित गणेश राठोड यांना चाळीसगाव तालुक्यातील पाटणा गावाजवळील एका शेतशेडमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. तेथून त्यांना लासलगावजवळील जंगलात सोडून आरोपी फरार झाले.
पोलिसांनी जंगलात शोधमोहीम राबवत जखमी अवस्थेतील गणेश राठोड यांना शोधून काढले आणि तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी हलवले. अटक करण्यात आलेले आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह चंदेल, निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. शेखर डोमोळे यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने केली. पथकात संदीप पाटील, मुरलीधर धनगर, महेश पाटील, सागर पाटील, भूषण शेलार, ईश्वर पाटील, जितेंद्र पाटील व दीपक चौधरी यांचा समावेश होता.