
जळगावमधून कार चोरणाऱ्या दोघांच्या राजस्थान मधून मुसक्या आवळल्या
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :– शहरातील जिल्हापेठ, रामानंदनगर आणि जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ एप्रिल रोजी तीन महागड्या चारचाकी वाहनांच्या चोरीचे गुन्हे नोंदवले गेले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने महिनाभराच्या तपासानंतर राजस्थानातील वाळवंटातून एक चोरीची कार जप्त केली असून, दोन संशयितांना अटक केली आहे
.चोरीनंतर पोलिस स्टेशन आणि एलसीबीने समांतर तपास सुरू केला होता. अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासूनही सुरुवातीला ठोस पुरावे मिळाले नाहीत. मात्र, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांना गुप्त सूत्राकडून माहिती मिळाली. मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर चोरीच्या वाहनांचे धागेदोरे राजस्थानातील सांचोर (जि. जालोर) येथे आढळले. त्यानंतर शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राजस्थान गाठले.सांचोर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने सुनील केशाराम बिष्णोई (वय २५) आणि सुनील ओमप्रकाश बिष्णोई (वय २४, रा. सरनाऊ, ता. सांचोर) यांना अटक केली. चौकशीत त्यांनी इतर दोन साथीदारांची माहिती दिली. अटकेतील दोघांना एएसआयअतुल वंजारी आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल हरीलाल पाटील यांनी जळगावला आणले. दरम्यान, शरद बागल यांनी सांचोर येथे तपास सुरू ठेवला. वाळवंटातील विरळ वस्तीत पाहणी केली असता, जंगलात एक बेवारस कार आढळली. फिर्यादीने तिची ओळख चोरीच्या कारशी जुळल्याची पुष्टी केल्यानंतर पोलिसांनी ती जप्त करून जळगावला आणली. इतर संशयित आणि वाहनांचा शोध सुरू आहे.ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, एएसआय अतुल वंजारी, हवालदार हरीलाल पाटील, हवालदार विजय पाटील आणि चालक शिपाई महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.