घोषणांपेक्षा कृतीची देशभक्ती; विद्यार्थ्यांची अनोखी तिरंगा रॅली!

घोषणांपेक्षा कृतीची देशभक्ती; विद्यार्थ्यांची अनोखी तिरंगा रॅली!
जळगाव : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा आणि मनात राष्ट्रभक्तीची भावना घेऊन विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला.
रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी “तिरंगा हातात, भारत हृदयात!”, “माझा देश, माझी जबाबदारी!”, “स्वातंत्र्य मिळाले… आता भारत घडवायचा आहे!” अशा विविध संदेशांचे फलक हातात घेतले होते. या माध्यमातून राष्ट्रप्रेमासोबतच शिस्त, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारी आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देण्यात आला.
रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रेरणादायी विषयांचे पोस्टर प्रदर्शन. देशाचा इतिहास, तिरंग्याचा प्रवास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, ‘वंदे मातरम्’, भारतीय संविधान आणि नागरिकांची कर्तव्ये आदी विषयांद्वारे विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
तसेच “जंक फूडला नकार, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला होकार!” हा आरोग्यविषयक संदेशही रॅलीतून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत निरोगी जीवनशैली आणि सकस आहाराचा संदेश विद्यार्थ्यांनी जनमानसापर्यंत पोहोचविला.
या उपक्रमातून “देशभक्ती म्हणजे केवळ घोषणा नव्हे, तर आपल्या कृतीतून देशासाठी योगदान देणे” हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या सहभागाने रॅली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.





