
भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अखेर अपात्र!
राज्य शासनाचा मोठा निर्णय; २३ एप्रिलपासून नगरसेवक पदही रद्द
भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ पालिकेच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर, राज्य शासनाने त्यांना नगराध्यक्ष आणि नगरसेवक अशा दोन्ही पदांवरून अपात्र ठरवले आहे. सोमवार, ४ मे २०२६ रोजी शासनाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केल्याने सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे.
काय आहे नेमके प्रकरण? भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर्फे गायत्री गौर-भंगाळे यांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यांनी सादर केलेल्या जातप्रमाणपत्रावर प्रतिस्पर्धी गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता. भंगाळे या मूळच्या महाराष्ट्रातील रहिवासी नसून मध्य प्रदेशातील असल्याचा दावा पुराव्यांसह करण्यात आला होता. जात पडताळणी समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्याने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते.
शासनाचा कडक पवित्रा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या संदर्भातील अहवाल शासनाकडे पाठवला होता. यावर गांभीर्याने विचार करून राज्य शासनाचे सहसचिव विद्या हम्पय्या यांनी ४ मे रोजी अपात्रतेचा निर्णय निर्गमित केला. विशेष म्हणजे, शासनाने २३ एप्रिल २०२६ पासूनच त्यांचे नगरसेवक पद निरर्ह (रद्द) ठरवले आहे, त्यामुळे त्यांची निवड आता पूर्णपणे अवैध ठरली आहे.
पुढील राजकीय दिशा काय? नगराध्यक्षा अपात्र ठरल्याने भुसावळच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. एकीकडे भंगाळे गट न्यायालयीन लढाईची तयारी करत असताना, दुसरीकडे शहरात नवीन निवडणुकीच्या चर्चांनी वेग घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता पालिकेची सूत्रे कोणाकडे जाणार आणि आगामी राजकीय समीकरणे काय असतील, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




