

भुसावळच्या राजकारणाला नवे वळण; अनिल चौधरी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंसह तिघांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबईतील नंदवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजकीय इनिंगला नवी दिशा; भुसावळच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा
भुसावळ | प्रतिनिधी : भुसावळच्या राजकीय वर्तुळात गुरुवारी मोठी घडामोड घडली. मुंबईतील नंदवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे आणि निखिल संतोषभाऊ चौधरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास; शिवसेनेला भुसावळमध्ये बळकटी
या प्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहर व परिसरातील विकासकामांना गती देणे, जनतेच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडणे आणि पक्षाची संघटना तळागाळापर्यंत मजबूत करणे, या उद्देशाने ही राजकीय वाटचाल सुरू केल्याचे मानले जात आहे.
जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्वाची उपस्थिती
या पक्षप्रवेशावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील, पाचोरा आमदार किशोरआप्पा पाटील, चोपडा आमदार चंद्रकांतअण्णा सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांतभाऊ पाटील, पारोळा आमदार अमोल चिमणआबा पाटील, उपनेत्या सरिता माळी-कोल्हे तसेच जळगाव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भुसावळमध्ये नव्या राजकीय समीकरणांची शक्यता
अनिलभाऊ चौधरी आणि नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भुसावळच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. विशेषतः आगामी काळातील स्थानिक राजकीय घडामोडी, संघटनात्मक विस्तार आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
शिवसेनेत झालेल्या या प्रवेशामुळे भुसावळमध्ये पक्षाची ताकद नेमकी किती वाढते आणि त्यातून आगामी काळात कोणती राजकीय समीकरणे आकाराला येतात, याकडे आता जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




