खान्देशगुन्हेजळगांव

राजमल लखीचंद ग्रुपवरील ‘फ्रॉड’चा ठपका हटवला – स्टेट बँक ऑफ इंडियाचा महत्त्वाचा निर्णय

राजमल लखीचंद ग्रुपवरील ‘फ्रॉड’चा ठपका हटवला – स्टेट बँक ऑफ इंडियाचा महत्त्वाचा निर्णय

जळगाव ;– जळगावमधील प्रसिद्ध दागिने व्यापारी राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. यांच्या खात्यावर असलेला फसवणुकीचा ठपका स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) हटवला आहे. बँकेने अधिकृत पत्राद्वारे ही माहिती दिली असून, या निर्णयामुळे कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.या संदर्भात राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. ईश्वरलाल जैन, मनीष जैन आणि कुटुंबीय उपस्थित होते. “सत्याचा विजय उशिरा का होईना, पण होतोच. आम्ही सुरुवातीपासून निर्दोष होतो आणि आज न्याय मिळाला,” असे मनीष जैन यांनी सांगितले.

13 मे 2020 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फसवणूक ओळख समितीने आर.एल. ग्रुपच्या खात्याला फसवणुकीच्या यादीत टाकले होते. हा अहवाल रिझर्व्ह बँकेला (RBI) सादर करण्यात आला आणि खाते सेंट्रल फ्रॉड रजिस्टरमध्ये नोंदवले गेले. मात्र, कंपनीने हा निर्णय कायदेशीर मार्गाने आव्हान दिले.

बँकेने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, कंपनीला आपली बाजू मांडण्याची संधी न दिल्यामुळे हा निर्णय घेतला गेला होता. त्यामुळे 18 फेब्रुवारी 2025 रोजी ठपका हटवण्यात आला आणि सेंट्रल फ्रॉड रजिस्टरमधून नोंद काढण्यात आली.तथापि, बँकेने हे देखील स्पष्ट केले आहे की, हा निर्णय अंतिम नाही. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, बँक भविष्यात पुन्हा तपास सुरू करू शकते.

या निर्णयामुळे राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. यांना मोठा दिलासा मिळाला असून, कंपनीच्या व्यावसायिक प्रतिमेला सकारात्मक परिणाम होईल. SBI च्या ठपक्यामुळे सीबीआय आणि ईडीने देखील तपास सुरू केला होता. आता हा ठपका हटवल्याने भविष्यात या तपासांवर परिणाम होईल आणि कारवाया मागे घेतल्या जातील, असा विश्वास ईश्वरलाल जैन यांनी व्यक्त केला.”स्टेट बँकेने चुकीच्या कारवाईबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, यासाठी आम्ही लवकरच अधिकृत पत्र पाठवू,” असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button