
ट्रॅव्हल्स प्रवासादरम्यान महिलेचे साडेचार लाखांचे दागिने चोरीला
महिनाभरानंतर उघडकीस आलेली घटना
जळगाव, प्रतिनिधी: पुण्याहून जळगावला परतणाऱ्या महिलेच्या बॅगेतून तब्बल ४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार महिनाभरानंतर लक्षात आला असून, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबकनगर येथे राहणाऱ्या आशा विकास कुलकर्णी (वय ५०) या आपल्या मुलाच्या लग्नासाठी पुण्याला गेल्या होत्या. ७ फेब्रुवारी रोजी लग्न पार पडल्यावर त्यांनी २ लाखांचे मंगळसूत्र, २ लाखांच्या पाटल्या आणि ३२,५०० रुपयांचे कर्णफुले असे एकूण ४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचे दागिने एका बॅगेत ठेवले होते. हे दागिने त्यांनी मुलाच्या घरी सुरक्षित ठेवले होते.
२३ फेब्रुवारीला कुलकर्णी दाम्पत्य खासगी ट्रॅव्हल्सने जळगावला परतले. प्रवासादरम्यान बस दोन ठिकाणी थांबली होती. आकाशवाणी चौकात उतरल्यानंतर ते घरी गेले.घरात साफसफाई करत असताना २४ मार्च रोजी त्यांनी बॅग उघडली असता दागिने गायब असल्याचे आढळले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सलीम तडवी करत आहेत. ट्रॅव्हल्समध्ये चोरी झाली की इतरत्र, याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत.