
जमिनीच्या मोजणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; जामनेरात खळबळ
जामनेर (प्रतिनिधी): जामनेर तालुक्यातील खर्चाणे येथील शेतकरी बाबुराव बंडू पाटील यांनी गुरुवारी सकाळी भूमी अभिलेख कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी घडलेल्या या घटनेने प्रशासन हादरले आहे.
शेतकरी बाबुराव पाटील यांचे म्हणणे आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून वेळोवेळी अर्ज करूनही भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी त्यांच्या शेतजमिनीची मोजणी करून देत नव्हते. कार्यालयात जाऊनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घेतला.
सुदैवाने, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या प्रकारामुळे प्रशासनाची कार्यपद्धती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे.
या घटनेनंतर तालुक्यात संतापाचे वातावरण असून, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.