
100 दिवसांच्या सुधारणा उपक्रमात जळगाव जिल्ह्याची राज्यात यशस्वी वाटचाल
जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याने प्रशासन आणि पोलीस विभाग अशा दोन्ही पातळ्यांवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा मुंबई येथे सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमात जिल्हास्तरावरील प्रशासन आणि पोलिसांची कार्यक्षमता, नवोन्मेषी उपक्रमांची अंमलबजावणी, जनसंपर्क, सेवा वितरणातील पारदर्शकता तसेच लोकाभिमुखता यासारख्या विविध निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यमापनात जळगाव जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे.
या गौरवप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालक सचिव आणि महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे सचिव, आणि जिल्हास्तरावरील अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शासकीय सेवा अधिक गतिमान झाल्याचे सांगत प्रशासकीय व पोलिस क्षेत्रातील समन्वयाचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जळगावच्या कामगिरीला इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरवले.
डॉ. आयुष प्रसाद आणि डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाने एकत्रितपणे जनतेपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी ठोस पावले उचलली असून, हे यश संपूर्ण जिल्हा यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.