
ऑपरेशन ‘सिंदूर’ साठी खेडगावचा नवविवाहित जवान देशसेवेच्या कर्तव्यास रवाना
पाचोरा (जि. जळगाव) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या पार्श्वभूमीवर देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व जवानांची सुटी रद्द करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदिचे) येथील नवविवाहित जवान मनोज पाटील देशरक्षणासाठी रवाना झाला आहे.
खेडगाव (नंदिचे) येथील मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा विवाह ५ मे रोजी यामिनी यांच्याशी पार पडला. परंतु, अवघ्या दोन दिवसांतच त्यांना तातडीने सेवास्थळी हजर होण्याचे आदेश मिळाले. मनोज पाटील यांनी देशसेवेचे कर्तव्य प्राधान्य देत नवविवाहित पत्नीला लवकर परत येण्याचे आश्वासन दिले आणि आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले.
या धाडसी निर्णयाबद्दल जवान मनोज पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी त्यांच्या घरी भेट देत मनोज पाटील यांचा सत्कार केला. तसेच, “युद्ध होऊ नये आणि जवान सुखरूप परत यावा,” अशी प्रार्थना करत पाटील कुटुंबीयांना धीर दिला.
“हळदही फिटली नाही आणि मेहंदीही मिटली नाही, अशा अवस्थेत देशसेवेसाठी हजर होण्याचा आदेश येणे, हे प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाची गोष्ट आहे,” असे प्रतिपादन या वेळी करण्यात आले.