इतर

भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची खात्री करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची खात्री करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

मुक्ताईनगर, ९ जुलै (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करताना कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच, भूसंपादन प्रक्रियेत कोणताही दुजाभाव होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.

मुक्ताईनगर तालुक्यातील बोरगाव बुजूर्ग ते मुक्ताईनगर मार्गावरील मौजे मुक्ताईनगर, अंतुर्ली आणि सातोड येथील शेतकऱ्यांच्या भूसंपादन दरासह इतर प्रलंबित मुद्द्यांवर विधानभवनात नुकतीच बैठक झाली. या बैठकीस महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

या बैठकीत इंदूर ते छत्रपती संभाजीनगर (एल-७५३) राष्ट्रीय महामार्गाचा मुक्ताईनगर तालुक्यातून जाणारा रस्ता थेट व कमी अंतराचा करण्यासाठी मार्गरेषा (अलाइनमेंट) बदलण्याचा विचार झाला. यामुळे रस्त्याचे अंतर कमी होऊन खर्चात बचत होईल, असे सांगण्यात आले.

भूसंपादन दराबाबत काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ज्यांचे भूसंपादन झाले आहे, त्यांना योग्य मोबदला मिळाल्याची खात्री करावी, असेही निर्देश देण्यात आले.

शेतकऱ्यांना जमिनीचे मोबदले सुधारित दराने देण्याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रशासनाला सूचना दिल्या. मागील १०-१२ वर्षांपूर्वीचे दर आणि सध्याचे बाजारभाव यामध्ये मोठा फरक असल्याने शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद (दूरदृष्य प्रणालीद्वारे), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, प्रांताधिकारी, भूसंपादन अधिकारी आणि शेतकरी संघर्ष समिती मुक्ताईनगरचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button