
शिक्षक दिन संपूर्ण जगात फक्त भारतात साजरा केला जातो – कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी
रोटरी मिडटाऊनतर्फे शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड
जळगाव प्रतिनिधी I शिक्षकांनी समर्पणवृत्तीने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन संपूर्ण जगात फक्त भारतात साजरा केला जातो, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले. रोटरी मिडटाऊनतर्फे आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. गणपती नगरातील डॉ. जी. डी. बेंडाळे कम्युनिटी वेल्फेअर सेंटरच्या भैय्यासाहेब नथमल लुंकड सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
व्यासपीठावर रोटरी मिडटाऊनचे सहप्रांतपाल संजय गांधी, अध्यक्ष ॲड. किशोर बी. पाटील, मानद सचिव डी.ओ. चौधरी आणि प्रोजेक्ट चेअरमन डॉ. सुमन लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम आणि सरस्वती देवीच्या पूजनाने झाली. यावेळी रोटरी मिडटाऊनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. स्वरूप लोढा यांच्या स्मरणार्थ नेशन बिल्डर अवॉर्ड आणि अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र सन्मानित शिक्षकांना प्रदान करण्यात आले.
कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी सांगितले की, २,३०० वर्षांपूर्वी चाणक्य यांनी निर्माण आणि विध्वंस हे शिक्षकांच्या कार्यावर अवलंबून असते, असे म्हटले होते. तसेच, डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी उत्कृष्ट शिक्षक आणि शिक्षण ही सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. शिक्षकांचे शिकवणे हे केवळ १०% काम आहे, तर ९०% काम विद्यार्थ्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करणे हे आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रभावित करतात आणि संस्कारित करण्याची दैवी देणगी त्यांना मिळाली आहे. चांगले शिक्षण आणि आरोग्य सेवा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, परंतु अपयश झाल्यास ही सर्वांची जबाबदारी आहे. दुर्दैवाने सरकारी शाळेतील शिक्षकांची मुले खासगी शाळेत शिकतात, तर शासकीय रुग्णालयांवर सर्वसामान्यांचा विश्वास उडाला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. रोटरी मिडटाऊनचे नेशन बिल्डर अवॉर्ड हे शिक्षकांच्या समर्पणाची पावती असून, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि संशोधन वाढीसाठी जबाबदारी सांभाळावी, असे आवाहन त्यांनी केले.
सन्मानित शिक्षक:
या वेळी रोटरी जळगाव परिवारातील १२ शिक्षकांना अवॉर्ड प्रदान करण्यात आले: डॉ. प्रशांत वारके, डॉ. माया आर्वीकर, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. काजल फिरके, छाया पाटील, काजल सुखवानी, तृप्ती बाकरे, प्रीत रावलानी, रोशनी अग्रवाल, पिंकी मंधान आणि सुरबाला चौधरी. यावेळी सहप्रांतपाल संजय गांधी आणि सत्कारार्थींच्या वतीने डॉ. रश्मी शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. अब्राहम लिंकन यांच्या पत्राचे वाचन सुरेखा शिरुडे यांनी केले. कुलगुरूंचा परिचय माजी अध्यक्ष डॉ. के.सी. पाटील यांनी करून दिला, तर स्व. डॉ. स्वरूप लोढा यांच्या कार्याची माहिती माजी अध्यक्ष अनिल एम. अग्रवाल यांनी दिली.
सूत्रसंचालन पुरुषोत्तम सारस्वत आणि प्रा. यशवंत सैंदाणे यांनी केले, तर आभार डॉ. सुमन लोढा यांनी मानले. या कार्यक्रमाने शिक्षकांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित झाले असून, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे कुलगुरूंनी सांगितले.





