बालविवाहावर प्रशासनाचा कडक पहारा; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन

बालविवाहावर प्रशासनाचा कडक पहारा; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन
बाल विवाह रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा
जळगाव : बालविवाह या कुप्रथेवर प्रभावी आळा घालण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार मुलीचे किमान वय 18 वर्षे व मुलाचे 21 वर्षे असणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक तसेच शहरी भागात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ग्राम बाल संरक्षण समित्यांमार्फत प्रत्येक विवाहाची वय पडताळणी केली जात आहे.
सन 2025 मध्ये चाइल्ड हेल्पलाईन 1098 च्या माध्यमातून 67 बालविवाह रोखण्यात आले असून 2026 मध्ये आतापर्यंत 27 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. एका प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
बालविवाह झाल्यास संबंधित पालक, नवरदेव, तसेच विवाह व्यवस्थापनाशी संबंधित सर्व सेवा पुरवठादारांवर सहआरोपी म्हणून कारवाई होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
अक्षय तृतीया व इतर शुभ मुहूर्तांच्या पार्श्वभूमीवर बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी आपल्या परिसरात अशा प्रकारची घटना आढळल्यास त्वरित 1098 या टोल-फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.





