जनगणनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ; आता ३० जूनपर्यंत प्रक्रिया

जनगणनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ; आता ३० जूनपर्यंत प्रक्रिया
मुंबई : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण बदल्यांना यंदा मुदतवाढ देण्यात आली आहे. जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया आता ३० जून २०२६ पर्यंत राबवता येणार आहे. यासंदर्भातील अधिनियमात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. बदल्यांच्या मुदतवाढीसंदर्भातील मसुद्यालाही बैठकीत हिरवा कंदील देण्यात आला.
देशभरात जनगणना २०२७ अंतर्गत पहिला टप्पा सुरू असून, त्यामध्ये घरयादी तयार करणे आणि घरगणना ही कामे १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत केली जाणार आहेत. या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.
यामुळे जनगणना प्रक्रियेत सहभागी शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बदल्यांसंदर्भातील अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येणार असून, या मुदतवाढीबाबतचा अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने जाहीर करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.





