
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगावात ध्वजारोहण उत्साहात
जळगाव, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पक्षध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. “पक्ष जनसामान्यांचा, आवाज महाराष्ट्राचा” या घोषवाक्याने कार्यक्रमाला प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी जळगाव शहर महानगराध्यक्ष ईजाजभाई मलिक यांच्या हस्ते पक्षध्वजारोहण करण्यात आले. ध्वजस्तंभाची पूजा माजी महानगराध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी आणि जिल्हा समन्वयक विकासदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आली.
कार्यक्रमात पक्षाच्या २७ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेण्यात आला. शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी पक्षाने केलेल्या संघर्षाची आठवण उपस्थितांनी जागविली. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा वारसा आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव केला. महिला आरक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार, शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय तसेच युवकांच्या रोजगारासाठी आयटी सेलची स्थापना यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची शपथ कार्यकर्त्यांनी घेतली.
पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच केक कापून पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन वाय. एस. महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनही त्यांनीच केले.
याप्रसंगी सौ. मंगलाताई पाटील, एस. डी. पाटील, महाडिक सर, विलास भाऊसाहेब पाटील, राजेश गोयल, जयप्रकाश चांगरे, डी. एम. पाटील, रिकू चौधरी, विनायक पाटील, सुनील भैय्या माळी, गौरव पाटील, रमेश पाटील, गिरीश सांगळे, अकिल पटेल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्ष संघटना अधिक बळकट करून जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा देणारा हा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छाही देण्यात आल्या. :::





