इतर

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जळगाव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना केवळ वर्गातील पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रस्तावित मुलांचे वसतिगृह क्रमांक ४, ‘सेंटर फॉर ट्रेनिंग फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन’, ‘सोफिस्टिकेटेड अॅनॅलिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी सेंटर’च्या फेज-१च्या इमारतीचे भूमिपूजन तसेच पीएम-उषा निधीअंतर्गत विद्यापीठाच्या परिसरात १० ठिकाणी उभारणी केलेल्या अत्याधुनिक कंटेंट स्टुडिओ, नंदुरबार येथील आदिवासी अकादमीमार्फत संचलित आदिवासी अध्यासन केंद्राचे ऑनलाइन उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दि. २९ ऑगस्ट रोजी करण्यात आले. तसेच विद्यापीठातील बी.ए. अप्लाइड सोशल सायन्सेस या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्राचा अनुभव मिळावा आणि त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी कांताई नेत्रालयासोबत सामंजस्य करारावर डॉ. भावना जैन व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वाक्षरी केली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते. व्यासपीठावर विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्राचार्य डॉ. जगदीश पाटील, प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील, प्राचार्य डॉ. एस.एस. राजपूत, प्रा. सुरेखा पालवे, ॲङ अमोल पाटील, नितीन झाल्टे, डॉ. पवित्रा पाटील,उच्च शिक्षण सह संचालक डॉ. पराग मसराम, कुलसचिव डॉ.विनोद पाटील,वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रा. योगेश पाटील हे मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रात्यक्षिक ज्ञानाला मोठे महत्त्व देण्यात आले आहे. केवळ वर्गात बसून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे आणि त्यांच्या कौशल्यांना दिशा मिळावी, या उद्देशाने या विद्यापीठात विविध उपक्रम व सुविधा निर्माण करण्यात येत आहेत तसेच विद्यापीठाने देशपातळीवरच्या क्रमवारीतही विद्यापीठाने चांगले स्थान मिळविले असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी तयार करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक शिक्षण घेऊन उद्योजक बनण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. व्यवसायाभिमुख शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या क्षेत्रात जाण्यासाठी आवश्यक पर्याय, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने विद्यापीठाने सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘कमवा व शिका’ योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि विविध प्रकारची कौशल्ये विकसित करणारे विद्यार्थी विद्यापीठाने घडवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी अत्यंत महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत असून शासनाच्या या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, आजचा दिवस केवळ विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा दिवस नसून विद्यापीठाच्या आणि भविष्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आधुनिकीकरणाची सुरुवात करणारा दिवस आहे. विद्यापीठात होत असलेल्या विविध विकासकामांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा आणि कौशल्याधारित शिक्षणाची संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले. तसेच जैन उद्योग समूह आणि भंवरलाल जैन कांताई जैन फाऊंडेशनच्या वतीने ११ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी मुलांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी जाहीर केली.

अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी म्हणाले की, ३५ वर्षांच्या वाटचालीत विद्यापीठाने केवळ अस्तित्व टिकविले नाही, तर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विविध बाबींची अंमलबजावणी विद्यापीठाने प्रभावीपणे केली आहे. विद्यापीठातील सुमारे दोन हजार शिक्षकांना एआयचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतरच्या टप्प्यात सर्व विद्यार्थ्यांना एआयचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. भविष्यातील शिक्षण आणि रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्यावर विद्यापीठाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलगुरूंनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्र, नवीन स्कूल ऑफ इन्टेलिजेन्ट सिस्टीम्स ॲण्ड टेक्नॉलाजीज, मुलांचे वसतिगृह क्र. ४, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सेंटर ऑफ एक्सलन्स इन जर्नालिझम व आदिवासी अध्यासन केंद्र यांच्या उभारणीसाठी राज्य शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठाने विविध संस्था तसेच भारत सरकारच्या विविध प्रकल्पांशी १७ सामंजस्य करार केले असून त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभवाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. वीणा महाजन यांनी तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले.
*********

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button