इतर

कृत्रिम टंचाई व साठेबाजी करणाऱ्या जिल्ह्यातील पाच कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

कृत्रिम टंचाई व साठेबाजी करणाऱ्या जिल्ह्यातील पाच कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

जळगाव (प्रतिनिधी):खरीप हंगाम सुरू होताच जिल्ह्यात खतांची कृत्रिम टंचाई आणि साठेबाजीचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जादा दराने खत विक्री, तसेच लिंकिंग व अनधिकृत साठवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांविरोधात कृषी विभागाने कारवाई केली आहे. बुधवारी (दि. ९) पाच कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चोपडा, चाळीसगाव, बोदवड व भुसावळ तालुक्यांतील कृषी केंद्रांची तपासणी केली. तपासणीदरम्यान सात कृषी केंद्रांमध्ये अनियमितता व गैरप्रकार आढळले. त्यातील चोपड्यातील २ आणि चाळीसगाव, बोदवड व भुसावळ येथील प्रत्येकी १ कृषी केंद्राचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विविध भागांतून मिळालेल्या तक्रारींनुसार कृषी विभागाने कारवाई सुरू केली असून दोषी आढळणाऱ्यांवर कडक उपाययोजना केल्या जात आहेत. आणखी तीन कृषी केंद्रांच्या बाबतीत सुनावणी प्रक्रिया सुरू असून निकालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती निरीक्षक विकास बोरसे यांनी दिली.

दरम्यान, जळगाव शहरातील एका नर्सरीची तपासणी करून तेथील औषधे आणि बियाण्यांच्या साठ्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. तसेच चोपड्यातील एका दुकानदाराने विनापरवाना खत व बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button