निपूण भारत अभियानाला नवी दिशा; तालुकास्तरावर समन्वय बैठकींचा उपक्रम सुरू

निपूण भारत अभियानाला नवी दिशा; तालुकास्तरावर समन्वय बैठकींचा उपक्रम सुरू
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची अभिनव संकल्पना; शिक्षकांशी थेट संवादावर भर
जळगाव | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘निपूण भारत अभियान’ला अधिक प्रभावी गती देण्यासाठी जळगाव जिल्हा परिषद प्रशासनाने नवा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून आता तालुकास्तरावर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि शिक्षकांच्या समन्वय बैठका आयोजित करण्यात येत असून या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तावाढीवर विशेष भर दिला जात आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी थेट संवाद
निपूण भारत अभियानाची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करण्यासाठी या बैठकींमध्ये शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधला जात आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती, शाळांमधील उपस्थिती, अध्यापनातील नाविन्यपूर्ण पद्धती, उपक्रमशीलता तसेच शाळास्तरावरील अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली जात आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होत आहे.
शिक्षकांमध्ये वाढला आत्मविश्वास
तालुकास्तरावर अधिकारी थेट शिक्षकांशी संवाद साधत असल्याने शिक्षकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. शिक्षण प्रक्रियेत अधिक उत्साहाने सहभागी होण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अधिक प्रभावी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्याची निपूण टक्केवारी वाढविण्यावर भर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचावे, अध्ययनाचा दर्जा उंचावावा आणि निपूण भारत अभियानातील जिल्ह्याची यशाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. या बैठकींच्या माध्यमातून शैक्षणिक अडचणींचे निराकरण आणि शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विविध तालुक्यांत बैठका संपन्न
या उपक्रमांतर्गत पारोळा आणि एरंडोल येथे मंगळवारी समन्वय बैठका पार पडल्या. तर बुधवारी बोदवड आणि जामनेर येथे बैठका घेण्यात आल्या. या बैठकींना शिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांच्यासह संबंधित तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.
‘प्रत्येक विद्यार्थी निपूण व्हावा’ हेच ध्येय
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण भविष्यासाठी शिक्षक, पालक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थी निपूण व्हावा आणि शिक्षणाच्या मूलभूत कौशल्यांमध्ये सक्षम बनावा, हेच प्रशासनाचे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक चळवळीचे वातावरण निर्माण होत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.





