
राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत जळगावच्या विनय चौधरी व रितेश तायडे यांना राष्ट्रीय पंचपदाची मान्यता
जळगाव, प्रतिनिधी : मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत जळगाव शहराचे श्री. विनय दिलीप चौधरी तसेच वरणगावचे श्री. रितेश विजय तायडे यांनी उल्लेखनीय यश संपादन करून राष्ट्रीय कबड्डी पंच म्हणून पात्रता प्राप्त केली आहे. त्यामुळे आगामी राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांमध्ये अधिकृत पंच म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.
कबड्डी खेळाचे नियम, तांत्रिक ज्ञान, पंचगिरीतील कौशल्य, निर्णयक्षमता आणि प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरीच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित परीक्षेत त्यांनी यश मिळवत जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील कबड्डी क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहनरावजी भावसार, उपाध्यक्ष चंद्रकांत लोढाया व बशीर बागवान, कार्याध्यक्ष राधेश्याम कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे, खजिनदार सुनील राणे, ॲड. रोहन बाहेती, अलेक्झांडर मणी, संजय संसारे, नयनसागर मणी, भास्कर पाटील, हितेश सोनी, अनिल कोळी, विवेक पाटील, प्रा. हरीश शेळके, आनंद महंगडे तसेच जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, खेळाडू व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




